पंढरपूर वारी टोलमाफी : सरकारचा टोलमाफीचा निर्णय, वारकऱ्यांना दिलासा

पंढरपूर वारी टोलमाफी

पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला असून, १८ जून ते १० जुलै या कालावधीत टोलमाफी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे मानाच्या १० पालख्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. विठ्ठल नामाचा जयघोष करत, दिंड्या घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. पंढरपूर वारीच्या मार्गावरील टोल नाक्यांवर जड व हलक्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर हा निर्णय लागू होणार असून, यामुळे वारकऱ्यांना टोल भरण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांचा खर्च कमी होणार असून, त्यांच्या प्रवासात होणारा अडथळा दूर होणार आहे.

पंढरपूर वारी टोलमाफी सार्वजनिक बांधकाम विभाग आदेश –

सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. परिवहन विभाग, पोलीस किंवा आरटीओमार्फत वाहनचालकांना आवश्यक स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

शासनाच्या परिपत्रकात नेमकं काय नमूद केलं आहे ?

१. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना “आषाढी एकादशी २०२५”, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधित आर.टी.ओ. यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी, दिनांक १८.०६.२०२५ ते १०.०७.२०२५ या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच असेल, अशा सूचना दिल्या आहेत. तसे स्टीकर्स / पासवर नमूद करण्यात यावे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील. याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. (नमूना सोबत जोडला आहे.) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

२. सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच, परिवहन विभागास देखील जादा बसेस, गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फत पथकर नाक्यांजवळ पोलीसांची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC), डेल्टा / MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत.

३. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते / महामार्गावर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. मुंबई-कोल्हापूर-बंगलोर, पुणे-सोलापूर इ. राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश MSRDC, NHAI, PWD च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कळविण्याचे आदेश दिले आहेत.

४. तसेच, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यक असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी.

५. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग, इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, इ.) या सर्वांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे, सूचना फलक लावणे, इत्यादी कार्यवाही त्या त्या कार्यान्वयीन यंत्रणांनी (सा.बां. विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, NHAI, इ.) करावीत.

६. सदर कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.

७. दर २०-२५ कि.मी. अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहिका, रस्ते खड्डे भरण्यासंबंधी मटेरीअल, क्रेन इ. व्यवस्था ठेवावी. तसेच, बऱ्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगतीपथावर आहेत. अशा कामांवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित महामार्ग प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.

८. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर, उपरोक्त कालावधीत, पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट द्यावी, असे ठरले असून राज्य परिवहन (S.T.) विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलीस ठाणे इ. कडे या अनुषंगाने कुपन / पास प्राप्त करून घ्यावेत. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक विभाग / शाखा / चौकी येथून भाविकांचे मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे.

९. ग्रामीण पोलीस / आर.टी.ओ. यांचेमार्फत दिले जाणारे कुपन्स / पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास / सा.बां. विभागास / NHAI कार्यालये यांना माहितीसाठी सादर करावी. जेणेकरून भाविक व वारकरी वाहनांना पथकरातून सवलत दिल्यानंतर संबंधित उद्योजकांना State Budget मधून नुकसान भरपाई देण्यात येईल.

१०. नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन व हँड होल्डिंग मशीन ठेवण्यात यावेत. ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही. याबाबत सर्व संबंधित महामार्ग प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करावी.

११. पथकर कंत्राटदारांनी संबंधित रस्त्याच्या क्षेत्रात / परिसरात वाहतूक पोलीसांसाठी आषाढी एकादशीच्या काळात जादा ट्रॅफिक वॉर्डन डेल्टा किंवा एम.एस.एस.सी. फोर्स उपलब्ध करून द्यावेत.

१२. पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना / जाहिर प्रसिद्धी करावी.

या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२५०६१६१८३१२४५११८ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

Leave a Comment